जिल्हा परिषद शाळा पानेवाडीत बालबाजाराचा उत्साह; विद्यार्थ्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे कौशल्य
घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पानेवाडी येथे मंगळवारी, दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी ‘बालबाजार’ (आनंदनगरी) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवणे तसेच आर्थिक व्यवहाराची समज प्रत्यक्ष अनुभवातून देणे हा होता.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:
इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी शेतीतील ताज्या भाज्या, स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ व वस्तूंचे 20 ते 25 स्टॉल लावले होते. या विक्रीतून जवळपास 25 हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पदार्थ जसे की भाजीपाला, समोसे, कचोरी, चहा, पाणीपुरी, गुलाबजाम, पोहे, खमंग पापड, चना उसळ यांसारख्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या.
- सार्थ हरिपाठ – अभंग क्र. १
- संत तुकाराम महाराज अभंग क्र. २३
- ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चौथा
- ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तिसरा
- ५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय दुसरा
शालेय परिसराचा ‘बाजार’ झाला:
बालबाजाराच्या दिवशी शाळेचा परिसर बाजारपेठेत रूपांतरित झाला होता. “ताजी भाजी घ्या, कोवळी भाजी घ्या”, “घ्या काका, घ्या दादा” अशा आवाजांनी परिसर गजबजून गेला होता. ग्राहकांना आकर्षित करताना विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवहार समजून घेतले आणि गणितीय कौशल्यांचा वापर केला.
पालक व ग्रामस्थांची उत्स्फूर्त साथ:
गावातील नागरिक, शाळेचे माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवरून खरेदी करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
उपक्रमाचे महत्त्व:
या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीचे अनुभव तसेच व्यवहारकुशलतेचे धडे मिळाले. आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची कला शिकण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयोग ठरला.
यशस्वी आयोजनामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा:
शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंभोरे सर, शिक्षक श्री. मेहेत्रे सर, श्री. लोदवाल सर, श्री. वाघ सर, श्री. ताठे सर आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी नियोजनबद्ध मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
उत्सवाची यशस्वीता:
बालबाजार हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शाळा व गावासाठी प्रेरणादायक ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नविन कौशल्ये आत्मसात करता आली, तसेच त्यांना शिक्षणासोबतच व्यावसायिकतेची देखील ओळख मिळाली.
संपूर्ण परिसरातील चर्चेचा विषय ठरलेला हा ‘बालबाजार’ भविष्यातही विद्यार्थी व शाळेसाठी नवीन संधी निर्माण करणारा ठरेल, यात शंका नाही.